Tuesday 26 February 2013

भालचंद्र नेमाडे आणि रा. रा. टीव्ही

भालचंद्र नेमाडे यांना उद्या २७ तारखेला नाशिकमधे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार मिळतोय. शिवाय कुसुमाग्रजांच्या जयंतीचा हा दिवस मराठी भाषा दिन म्हणूनही मानला जातो. ह्या दोन गोष्टी उद्या आहेत, त्यांची नांदी म्हणून आज ही नोंद. 'उद्या'ऐवजी 'आज' का? तर एकूणच 'उद्या'ची खात्री नसते म्हणून. म्हणजे काय? तर नोंद वाचून पाहा :

सुरुवातीला हा व्हिडियो पाहूया, टीव्ही चॅनलवरच्या एका लहानशा मुलाखतवजा बातमीचा -


चिपळूणमधे झालेल्या ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनादरम्यान राज्यभरातल्या लेखकांना 'एबीपी माझा'ने आवडतं लिखाण कोणतं असं विचारलं, त्यात भालचंद्र नेमाडे यांच्या 'कोसला' आणि 'हिंदू' यांचं आवडती कादंबरी म्हणून लेखकांनी नाव घेतलंय. मराठी साहित्याची चौकट बदलणारे, कादंबरीलेखनाची नवी शैली निर्माण करणारे नेमाडे यांचं वेगळेपण त्यामुळे पुन्हा एकदा समोर आलंय. - असं आपल्याला सुरुवातीला सांगितलं जातं. त्यानंतर नेमाड्यांशी गप्पा मारूया, असं निवेदक आपल्याला सांगतो. 

यात नेमाडे औंरगाबादला कॅमेऱ्यासमोर बसलेले आहेत, तर निवेदक मुंबईतल्या स्टुडियोत उभा आहे. सुरुवातीला 'कोसला'चं गारूड अजूनही कायम का आहे असं वाटतं, असा प्रश्न विचारला जातो. नंतर 'हिंदू'ची वैशिष्ट्यं विचारली जातात. या सर्वांवर नेमाडे उत्तरं देतात, ती मुळातून ऐकता येतील.

त्यानंतर 'हिंदू'च्या दुसऱ्या भागाबद्दलचा प्रश्न विचारताना निवेदक म्हणतो की, मोठा चाहतावर्ग तुमच्या नवीन लिखाणाची आतूरतेने वाट बघतोय, तर दुसरा भाग कधी येईल?

यावरही नेमाडे काहीसं कथानक स्पष्ट करून 'हिंदू'चा दुसरा भाग 'वंशवृक्ष पारंबी' ह्या वर्षीच येईल असा अंदाज देतात. यात नेमाडे म्हणतात की, तसे कच्चे खर्डे खूप झालेत, ते आत्ताही छापता येतील, पण वाचक हल्ली इतके हुशार झालेत तुमच्यासारखे की त्यांना खराब वाचायला देणं आपल्याला परवडणार नाही. ह्याने इतकं थांबून असं खराब लिहिलं तर न लिहिलेलंच बरं, असं लोक म्हणतील. अनेक थरातले, खेड्यातलेपाड्यातले असे खूप वाचक झालेत. 

यानंतर विनोदाला सुरुवात होते. नेमाड्यांना निवेदक त्यांचं अखिल भारतीय साहित्य संमेलनाबद्दलचं मत विचारतो, त्यावर नेमाडे म्हणतात : आधी आपण त्यावर बोलणं बंद करावं. कारण ते आता अगदी शून्याच्या खाली गेलेलं आहे. याच्यापुढे आणखी खाली ते जाईल असं काही वाटत नाही. लोकांनी त्यावर बोलण्यापेक्षा लिहावं - वाचावं. 

मग नेमाडे आणखी अशीच काही हाणाहाणी करतात, जसं की, साहित्य संमेलनाला जाण्याची अट बहुधा हीच असावी की लिहिलं वाचलं नसेल तरच इथे या, वगैरे.

यावर म्हणजे सगळीच साहित्य संमेलनं बंद केली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं का, असं निवेदक विचारतो. त्यावर नेमाडे म्हणतात, लहान संमेलनं हवीत, वगैरे. 

कदाचित म्हणूनच साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे तीन दिवसांचा पांढरा हत्ती असं म्हटलं जातं, असं निवेदक म्हणतो त्यावर नेमाडे म्हणतात, हत्ती पण नाही, ती तीन दिवसांची अळीच असते. 

आता या कार्यक्रमात मधे निवेदक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांशीही - नागनाथ कोत्तापल्ले यांच्याशी-  बोलतो. नेमाड्यांकडे लक्ष देऊ नये, असं कोत्तापल्ले म्हणतात. जिवंत समाज असतो तिथे वाद होणार. मिलिटरीमधे एकाने आदेश द्यायचा आणि बाकीच्यांनी मान्य करावं असं होतं, पण समाजात तसं होत नाही, आदी समर्थन करून कोत्तापल्ले काही बोलू पाहातात.

कोत्तापल्लेंनतर लगेचच 'लोकसत्ते'चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांच्याशीही निवेदक संवाद साधतो. कुबेर म्हणतात की, या संमेलनाचा साहित्याशी काहीही संबंध नाही. यासंबंधी 'लोकसत्ते'चा अग्रलेखही वाचता येईल. कारण त्या लेखाचा संदर्भ कुबेर बोलताना देतात.

मधल्या या दोन लहान गप्पांनंतर पुन्हा निवेदक नेमाड्यांकडे येतो आणि साहित्य संमेलनं बंद करायला हवीत, तर साहित्याचा प्रसार कसा करावा याबद्दल विचारणा करतो. त्यावर नेमाडे म्हणतात, की तळागाळात पुस्तकं गेली पाहिजेत, लिहिणं - वाचणं हेच मुख्य करण्यासारखं आहे. मल्याळीमधे पहिल्या आवृत्तीच्या चाळीस हजार प्रती खपतात आणि मराठीत एक-दीड हजार प्रती म्हणजे लाजिरवाणी स्थिती आहे. ती बदलली पाहिजे. कारण वाचणारे आहेत.

या कार्यक्रमात आपल्याला काय सांगण्यात आलं?

तर,

१. नेमाड्यांच्या 'कोसला' आणि 'हिंदू' या अजूनही प्रभाव ठेवून आहेत आणि राज्यभरातून संमेलनाला आलेल्या अनेक लेखकांनी या कादंबऱ्या त्यांच्या आवडत्या असल्याचं सांगितलं.

२. नेमाडे हे साहित्याची चौकट बदलणारे आणि कादंबरीलेखनाची नवी शैली निर्माण करणारे लेखक आहेत.

३.  हल्लीचे मराठी वाचक हुशार झालेले आहेत.

४. 'हिंदू'च्या दुसऱ्या भागाची एक मोठा चाहतावर्ग आतूरतेने वाट पाहातो आहे.

एवढ्या सुंदर माहितीनंतर साधारण सोळा मिनिटांच्या या कार्यक्रमात शेवटी आपल्याला सर्वांत महत्त्वाची माहिती दिली जाते, त्यात निवेदक म्हणतो - भालचंद्र नेमाडे हे कोण आहेत नेमके, ते अतिशय ज्येष्ठ असे लेखक आहेत, नेमके कोण आहेत ते आपण पाहूया? 
त्यानंतर कोसला, बिढार, जरीला, झूल, हिंदू या त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांचे उल्लेख, मेलडी हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. हिमाचल प्रदेश सरकारच्या शिफारशीवर गतवर्षी त्यांनी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला, अशा पाट्या आपल्याला पडद्यावर पाहायला मिळतात .

आणि या पाट्यांबरोबर खाली एक सततची पाटी असते : राहा अपडेट.
***

हे सगळं पाहिल्यानंतर कदाचित काहींना असं कुठेतरी ऐकलेलं आठवू शकेल की, नेमाडे टीव्हीच बघत नाहीत. त्याबद्दल एक म्हणणं सतीश काळसेकरांनी त्यांच्या 'वाचणाऱ्याच्या रोजनिशी'त दिलंय, ते असं :
आताच्या बदललेल्या काळात आणखी एक नवाच ताप आपण स्वतःहून ओढवून घेतला आहे. तो म्हणजे दूरध्वनी आणि त्याची पुढची पायरी, भ्रमणध्वनी, आणखी एक, अखंड चालणारे दूरदर्शन. आपल्यापुरते हे सगळे टाळावे तर ते फक्त आमचे ज्येष्ठ मित्र भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्यांनाच शक्य.
पान २०

नेमाडे टीव्ही पाहत नसले तरी लोकांनी त्यांना टीव्हीवर पाहिलेलं आहे. आणि 'हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ' ही कादंबरी ६०३ पानांची आहे. या दोन वाक्यांचा एकमेकांशी काय संबंध, असं कोणी विचारू शकेल. तर त्यांचा एकमेकांशी काहीच संबंध नसावा. किंवा असेलही.
***

आता आपण 'वाचा' या अनियतकालिकात नेमाड्यांनी १९६८मधे लिहिलेल्या 'हल्ली लेखकाचा लेखकराव होतो तो कां?' या लेखाकडे वळू या. हा लेख नेमाड्यांच्या 'टीकास्वयंवर' या ग्रंथात समाविष्ट केलेला आहे. या लेखाची सुरुवात अशी आहे :
नव्या-जुन्या लेखकांनी व अड्ड्याअड्ड्यांनी एकमेकांचा उथळपणा व अप्रामाणिकपणा सिद्ध करीत राहावे, हे नव्या मराठी साहित्यातले एक आवश्यक दुखणे होऊन बदले आहे. गेल्या दीडशेक वर्षांत इंग्रजीद्वारा आपल्या साहित्याचे पुनरुज्जीवन होण्यापेक्षा पडझडच जास्त झाल्याचे दिसते. पुनरुज्जीवनास लागणारी विद्वत्ता व बुद्धिमत्ता अंगी असणारी निदान एक तरी तेजस्वी लेखकांची टोळी निपजल्याशिवाय साहित्याला उसनवारी पचवून येणारे उमदेपण येत नाही व परंपरा फोफावत नाही, हे आपल्या युगप्रवर्तक म्हणवणाऱ्या व दरवर्षी दिल्लीस जाऊन पद्मश्री घेऊन येणाऱ्या थिट्या लेखकांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे आपल्या समाजात एक तर विद्वत्ता व बुद्धिमत्ता नसावी किंवा असलीच तर अशी माणसे लिहिण्यात रस घेत नसावी, असे म्हणणे भाग आहे. म्हणजे मग लिहिले जाते ते कोणाकडून? तसेच आपल्या साहित्यातला हिणकसपणा आपल्या लेखकांच्या उथळपणातून व अप्रामाणिकपणातून येतो, हे जर खरे असेल तर आपल्या अशा लेखकांना वेळीच त्यांचे दोष का दाखवले जात नाहीत? शिवाय एक प्रकारचे वाङ्मयीन ठोंबेपण मराठीव्यतिरिक्त अन्य भाषांतही कमीअधिक प्रमाणात दिसत आहे असे इतिहास सांगतो, तर ह्या सार्वत्रिक घसाऱ्याचे कारण काय? ह्याच्या अनेक कारणांची स्पष्ट छाननी करण्याचे येथे योजिले आहे.
(टीकास्वयंवर, पान ३३-३४)

आणि या लेखाचा शेवट असा आहे :
लेखक आता आपल्या जाणिवांशी कितपत प्रामाणिक राहू शकेल हा सगळ्यांत मोठा प्रश्न आहे. लेखकाचे जाणवणे हे मानवी समाजाच्या विकासप्राधान्यामुळे व शास्त्रीय दृष्टिकोनामुळे दुय्यम, संकुचित झाले आहे हे तर खरेच, परंतु तो इतर नागरिकांप्रमाणे भौतिकताप्रिय, सुखलोलुप व स्थैर्यलंड झाल्याने अतिशय अप्रामाणिक असू शकेल. हल्लीची मोठमोठी म्हणून गाजलेली पुस्तकेही निव्वळ 'वाचनीय' तेवढी असतात याचेही कारण हेच आहे. जगातल्या आपल्या वाटेला आलेल्या, उरल्यासुरल्या दुःखावर फक्त 'लिहून' तो एरवी सुखाने जगू इच्छितो. साहित्यापेक्षा अर्थातच जीवनाच्या गरजा जास्त महत्त्वाच्या वाटणे बरोबरच आहे. लेखकाचे कार्य फक्त आरशासारखे, जीवन फक्त दाखवण्याचे आहे, असे कोण्या सराईत टीकाकाराने म्हटले की प्रश्न सुटेल असे नाही. साहित्य सुखासुखी मरत असेल तर मरू द्यावे असेही काही लोक म्हणतील, क्वचित एक चादर मैलीसीमाणदेशी माणसं लिहिणारे मोठे लेखक होऊन जातात, नाही असे नाही. परंतु हे मोठे लेखक पूर्वी 'नाइलाजाने' भोगाव्या लागणाऱ्या दुःखावर मोठे होऊन मुंबईत किंवा पुण्यात आपले दैनंदिन जीवन सुरक्षित, सुखकर करून पूर्वीच्या अनुभवावर सफेती फिरवून इतरांसारखे स्टँडर्डने राहात असल्याचे आढळेल. ह्याला जर कोणी कलाकाराचे अधःपतन म्हणणार नाही तर आमचा सगळा लेखच वाया गेला म्हणावयाचा. त्यातून सर्व मानवी समाज भौतिक राहणी उंचावायला विडा उचलून बसलेले; आणि निरोगी, दुःखरहित प्रजेचे डोहाळे सर्वांना लागलेले. दुःखाला सामोरे जाण्याची कुणाची तयारी नाही. तात्पर्य, सांस्कृतिक विकासात भौतिकतेच्या मोहिनीचा एक प्रवाह साहित्यकलेच्या तटावर कायम धडका मारीत आहे आणि त्यातून साहित्य कसे बचावते हे सांगणे मुश्किल आहे.
ह्या कलेचे हे दुर्दैवी अधःपतन थेट होमर-व्यासादिकांपूर्वीपासूनच हळूहळू आपल्यापर्यंत आले की काय हे आज ताडता आले तरी बिनपुराव्याचे आहे. परंतु आज आपल्या युगातील पुराव्यांनी ह्या अधःपतनाचे निदान करता येते. जीवनाचे व सृष्टीचे रौद्र स्वरूप ज्या भाग्यवंतांच्या वाट्याला आले त्यांनाही ते वरदायी अनुभवविश्व परवडत नाही. मोठमोठ्यांची ही दशा, तर निव्वळ मानमान्यता-नावलौकिकासाठी, भांडवल म्हणून पैसा मिळवण्यासाठी, वाचकप्रियतेसाठी, बंडखोरीसाठी, वर्तमानपत्रे-मासिके भरण्यासाठी व इतर अनेक भौतिक कारणांसाठी फक्त लिहिणाऱ्या आपल्या सार्वजनिक दौलतमंद लेखकांकडून किती टक्के प्रामाणिकपणाची अपेक्षा करावी हे सांगण्याचीसुद्धा गरज नाही. त्यातून धंदेबाजी व अड्डेबाजी ही एक परंपराच झाली आहे.
पण सुदैव हे की अजून कुठेतरी लिहिण्याच्या अवस्थेतला खास आदिलेखक व वाचण्याच्या अवस्थेतला अस्सल वाचक ही दोन्ही खिन्न माणसे भौतिकतेच्या युगातही आपल्यात कशीबशी जिवंत आहेत हे जाणवते. एरवी आपण विकासशील मानवी समाजाचे सुखलोलुप नागरिक होत. आदिलेखकाचे तेज क्वचित कुठे नव्या पुस्तकात जाणवेल तेवढेच. एरवी तो उग्र प्रचंड लेखक नाहीसाच होत आहे. आणखी एक वन्य पशु नामशेष होत आहे. निसर्गाला तो नको आहे. त्याचे रक्षण करा व सप्ताह साजरा करा, पोस्टरे लावा व तिकिटे काढा. PRESERVE WILD LIFE.
(पान ४४-४६)

साकेत प्रकाशन
***

उद्याच्या दिवशीचं निमित्त साधून ही नोंद आज केली याचं एक कारण आपण अप-'डेट' राहू इच्छित नाही हे आहे.

आणि तसंही उद्याची खात्री नाही म्हणून आज ही नोंद केली असली तरी आजचा उद्या हा उद्याच्या दिवशी आजच असणार.

धन्यवाद.

वाचत राहा 'रेघ'.

1 comment:

  1. पहिल्या लेखांशांबद्दल हा..हा.हा...नंतरच्याबद्दल _/\_ लय भारी झालंय...

    ReplyDelete