Wednesday 30 January 2013

काही 'धार्मिक' बातम्या आणि नरहर कुरुंदकर

पंधरा मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला ठेवलं तर भारतातले २५ कोटी मुसलमान १०० कोटी हिंदूंना धडा शिकवतील, असं वक्तव्य 'ऑल इंडिया मज्लिस ए इत्तिहाद अल- मुस्लीमीन' या आंध्रप्रदेशातील पक्षाचे हैदराबादेतून तिथल्या विधानसभेवर गेलेले आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी केलं. त्यानंतर धार्मिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली, हा सर्व तपशील घडल्याला आता महिना उलटलेला आहे. यासंबंधी 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली'मधलं संपादकीय वाचून अधिकची काही माहिती मिळू शकेल. बाकी, 'विकिपीडिया'वरही काही सापडू शकेल.

या घटनेनंतर त्या संदर्भात व अशा पद्धतीच्या विविध आडव्यातिडव्या वक्तव्यांविषयी टीव्ही चॅनलांवर चर्चाही झालेल्या आहेत. वर्तमानपत्रांमधे लेखही आलेले आहेत. आता आपण जरा पूर्वीच्या हैद्राबादी निजामाच्या संस्थानाचा भाग असलेल्या, आताच्या मराठवाड्यात नांदेडमधे होऊन गेलेल्या नरहर कुरुंदकरांची आठवण जागवूया.

का?

अशा वक्तव्यांमागचा इतिहास पडताळून पाहाणं का आवश्यक आहे ते कळावं म्हणून. 

वरच्या ओवेसींच्या वक्तव्याबद्दल बोलायचं, तर हैद्राबाद संस्थान भारत राष्ट्रात विलीन झालं तो लढा जवळून पाहिलेल्या आणि लहान वयात शक्य होईल तेवढ्या प्रमाणात त्यात सहभागी झालेल्या कुरुंदकरांनी त्यांच्या 'जागर' या ग्रंथाच्या प्रस्तावनेत काय नोंदवलंय ते पाहाणं महत्त्वाचं ठरू शकेल.
भारताच्या इतर प्रांतातील लढ्यापेक्षा हैद्राबाद संस्थानातील लढ्याचे स्वरूप निराळे होते. तो केवळ लोकशाही स्वातंत्र्याचा आणि जनतेच्या बाजूने संस्थानिकाच्या विरुद्धचा लढा नव्हता. त्या लढ्याचा आशय कितीही शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी तो मुस्लिम जातीयवादाच्या एका प्रबल केंद्राविरुद्ध चालू असणारा हिंदू प्रजेचा लढा होता, ही गोष्ट नाकारता येणारी नव्हती. कै. सिराजुल हुसेन तिरमिजी, हुतात्मा शौयेबुल्लाखान, कोप्पल येथील चार-पाच मुस्लिम सहकारी, लढ्याच्या शेवटच्या काळात लढ्यात सहभागी झालेल्या सात मुस्लिम नेत्यांची नावे कितीही उच्चारवाने घोषित केली तरी हैद्राबाद संस्थानातील खालपासून वरपर्यंतचा संपूर्ण मुस्लिम समाज हैद्राबाद संस्थान भारतातून वेगळे रहावे, स्वतंत्र रहावे, या मताचा होता, ही गोष्ट लपणे शक्य नव्हते. आमच्या डोळ्यांसमोर वस्तुस्थितीचे चित्र स्पष्टपणे उभे होते. अशा अवस्थेत १४-१५ वर्षांच्या मुलालासुद्धा काँग्रेस संघटनेची अधिकृत भूमिका खोटी आणि चुकीची आहे, हे जाणवतच होते.
त्या वेळच्या काँग्रेसची अधिकृत भूमिका अशी होती की, मुस्लिम लीग आणि हैद्राबाद संस्थानातील 'इत्तेहादूल मुसलमीन' यांसारख्या संघटना वरिष्ठवर्गीय मुस्लिम भांडवलदारांच्या व जमीनदारांच्या संघटना असून त्या परकीय सरकारच्या तालावर नाचणाऱ्या इंग्रजधर्जिण्या संघटना आहेत, पण सर्वसामान्य मुसलमान असा नाही. तोही देशावर प्रेम करणारा, राष्ट्रीयत्वाचे आव्हान पोहोचणारा, स्वातंत्र्याला उत्सुक असणारा असा समाज आहे. लीगचा आवाज हा मुसलमानांचा प्रातिनिधिक आवाज नव्हे. मोठमोठ्या नेत्यांनी ही अधिकृत भूमिका अनेक पुराव्यांनी तपशीलवार समजावून सांगितली, तरी आम्हांला पटणे शक्य नव्हते. मुस्लिम समाज व जनता या संघटनेत आहे; या संघटनेचे नेते वरिष्ठवर्गीय असतील, पण त्यांच्याच मागे मुस्लिम समाज आहे, हे सत्य आम्ही नाकारू शकत नव्हतो, सर्वसामान्य मुस्लिम माणूस धार्मिक राष्ट्रवादी राजकारणाचा भाग आहे व होता.

(जागर, पान १०-११)

हैद्राबादचा हा इतिहास लक्षात घेतला तर तिथे ओवेसींचा पक्ष काय करू शकतो, कशाचा फायदा उपटवू शकतो आणि कोणत्या वक्तव्यातून काय घडवू शकतो ते स्पष्ट होईल.
***

ओवेसींच्या वक्तव्य एकीकडे झाल्यानंतर भारताचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वक्तव्य केलं की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष भगव्या दहशतवादाला खतपाणी घालतायंत. शिद्यांच्या वक्तव्याचं स्वागत पाकिस्तानातल्या 'जमात-उद-दावा' या दहशतवादी संघटनेचा संस्थापक (आणि मुंबईवरच्या '२६/११' हल्ल्यांचा सूत्रधार) हफीझ सईद याने केलं. यापूर्वीही अशी वक्तव्यं होत आल्येत. आणि होत राहातीलही. यातल्या कुठल्याही मुद्द्यावर टीव्हीवर झालेल्या चर्चांमधे इतर वक्तव्यांचे दाखले देण्यात आले. त्यामुळे हा गुंता एकमेकात किती घुसलाय हे समजू शकतं.

या सर्व विधानबाजीसंबंधी थोडीफार 'सेक्युलर' स्पष्टीकरणं कुरुंदकरांच्या वरती उल्लेख केलेल्या पुस्तकात सापडतील.

कशी?

हे समजून घेण्यासाठी त्यांचा हा परिच्छेद पाहूया-
हिंदूंचा जातीयवादसुद्धा नीट समजून घेतला पाहिजे. जनसंघ, आर.एस.एस., हिंदुमहासभा असल्या प्रकारच्या पक्षांतच हिंदू जातीयवाद असतो, असे नाही. तसे असते, तर फार बरे झाले असते! भारतीय निवडणुकीत सर्व सेक्युलर पक्षांना मिळून ७० टक्क्यांच्या आसपास मतदान होत असते. हिंदू जातीयवाद्यांचे सर्वांत मोठे समूह निधर्मीपणाचा बुरखा पांघरून सेक्युलर पक्षांतच ठाण मांडून बसलेले आहेत! म्हणून मुस्लीम जातीयवादाविरुद्ध झगडण्याचा कोठलाही कार्यक्रम पुढे रेटणेच कठीण झाले आहे. कोठलाही प्रश्न उपस्थित झाला, की हिंदू जातीयवाद दोन-तीन सोज्ज्वळ भूमिका घेत असताना दिसतो. पहिली सोज्ज्वळ भूमिका सर्व धर्म सारखेच आहेत, हे तुणतुणे वाजवीत सर्व धर्मांची तोंडभर स्तुती करण्याची आहे. म्हणजे कोणत्याही धर्माबाबत धर्मचिकित्सेची किंवा धार्मिक गुलामगिरीविरुद्ध झगडण्याची गरजच बाजूला झटकून टाकता येते! दुसरी तितकीच सोज्ज्वळ भूमिका धर्माविषयी काहीच न बोलता सर्व जातीयवाद्यांशी तडजोडी करण्याची आहे. या तडजोडीची आत्मघातकी चढाओढ मशावरतला पाठिंबा देण्यात साम्यवादी व समाजवादी पक्षांनी जी एकमेकांवर ताण केली, तेथे दिसून येते. तिसरी सोज्ज्वळ भूमिका हृदयपरिवर्तनाची आहे. मुस्लिम समाजाबाबत कोणताही प्रश्न निघाला की, 'हा प्रश्न मुसलमानांना समजावू सांगा, त्यांना पटू द्या, त्यांना मागणी करू द्या म्हणजे सोडवू,' असे सांगण्यात येते. हा पदर झटकण्याचा एक प्रकार आहे!
(पान १७७)
***

'सामना'चे दिवंगत संपादक किंवा सध्याचे अस्तंगत होत असलेले संपादक काय म्हणतात ते वाचून मुस्लीम धर्माबद्दल मतं बनवणं काही बरं नाही. पण त्याबरोबरच सगळे धर्म सारखेच आहेत असं म्हणत भाबडी भूमिका घेणंही फारसं बरं नाही. हे फक्त मुस्लीम धर्माला लागू नाही, हिंदू असो, ख्रिस्ती असो किंवा इतर कोणी. सबगोलंकारीपणाऐवजी, त्या-त्या संदर्भात काही समजून घेता येईल का, असा प्रयत्न बरा वाटतो. सबगोलंकारीपणाने मूळ प्रश्नाची तड लागत नाही. किंबहुना अशी भूमिका एकूणच जातीयवादाला पूरक ठरते, असं कुरुंदकरांचं म्हणणं आहे. या त्यांच्या म्हणण्यातलं तथ्य महाराष्ट्रातही नुकतंच दिसून आलंच, चिपळूणला झालेल्या जानेवारीच्या मध्यात झालेल्या ८६व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात.

साहित्य संमेलनासंदर्भात कुरुंदकरांचं म्हणणं कसं लागू होतं, हे स्पष्ट होण्यासाठी आधी त्यांचं म्हणणं सांगूया-
हिंदू मनाला कोणते परिवर्तन मानवतच नाही. ज्या वेळी हिंदू समाजात पुरोगामी विचार निर्माण झाले, त्या वेळी हिंदू समाजातही पुरोगामी शक्तींना फारसा पाठिंबा नव्हता. सतीबंदी मागणारे, इंग्रजी शिक्षण मागणारे मूठभर, पाचपन्नास लोक होते. याविरोधी तक्रार करणाऱ्यांचे अर्ज व प्रस्थापित मूल्यांना पाठिंबा देणाऱ्यांचे अर्ज हजारो सह्यांनी भरलेले होते. हा आपलाच इतिहास विसरून जाऊन सेक्युलर बुरख्यातले हिंदू नेते मुस्लिम बुरख्याच्या बाबतीत मात्र हृदयपरिवर्तनाच्या गोष्टी बोलतात! मुस्लिम समाजात परिवर्तन होत नाही, याचे मुख्य कारण हे आहे की, हिंदू समाजातील सेक्युलर नेतृत्वही परंपरेने चालत आलेल्या परंपरावादी नेत्यांच्याच हातात आहे! आणि या परंपरावाद्यांना कर्मठ मुस्लिमांशी हातमिळवणी करणे मतदानाच्या दृष्टीने सुरक्षित वाटते. परिवर्तनविरोधी स्थितीवादी असणारा हिंदू जातीवादी मुस्लिम जातीयवादाचे संरक्षण करतो, --

(पान १८०)

कुरुंदकरांच्या पुस्तकातल्या वरच्या परिच्छेदातलं शेवटचं वाक्य साहित्य संमेलनामधे लागू पडलं.

कसं?

तर, ब्राह्मण व हिंदुत्त्ववादी जातीयवादाने मुसमुसलेल्या संयोजकांनी मराठी लेखक आणि मुस्लिम समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या घरापासून सुरू होणारा ग्रंथदिंडीचा मार्ग स्थानिक मुस्लिम टोळक्याच्या विरोधापायी बदलून टाकला.
***

'जागर' : प्रकाशक - देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि. : किंमत - दोनशे रुपये.
कुरुंदकरांच्या राजकीय लेखांचा हा ग्रंथ आहे. साधारण १९६७पासून पुढच्या दोन वर्षांत हे लेख लिहिले गेल्याचा अंदाज प्रस्तावनेवरून बांधता येतो. एकूण पुस्तकाची पानं २६३ आहेत. त्यात चाडेचार पानं भरणारी १२० संदर्भग्रंथांची यादी आहे.

आपण वरच्या मजकुरात जे दाखले दिले ते या ग्रंथातल्या तिसऱ्या विभागातले आहेत. त्यात 'सेक्युलॅरिझम् आणि इस्लाम', 'धर्मग्रंथ-अनुयायी-जीवन', 'राजकीय शोध व बोध' अशी तीन प्रकरणं आहेत.

हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन अशा कोणत्याही धर्माबद्दल काहीएक स्पष्ट आणि संदर्भावर आधारित मांडणी या लेखांमधून आहे. मतभेदांना जागा आहे.

5 comments:

  1. लेख छान झाला आहे.

    - कमलेश कुलकर्णी

    ReplyDelete
  2. Brilliant Ek Regh....not just that but also well said for the modern era with shortening attention span....As I have said, I have been lucky to hear him as a kid for a number of years and those were some of my most memorable moments of my life....I would come home and tell my parents what all he said...I thought India was changing for better....alas!

    However, I can NOt still reconcile with NK on his justification of partition and he never spoke about what happened to the Muslims after Hyderabad Police Action...I am writing a detailed entry on the latter....

    If he were alive today, he would be aghast at the most of value-less politics in Maharashtra except the rise of the Dalits (and even OBC) as a force; he would aghast at the levels to which intellectual discourse has fallen in his state; he would be aghast at the quality of the most Indian newspapers and news channels....he would he aghast at the marginalization of Muslims in Maharashtra....he would be aghast at the extent of right-wing influence on Indian media and urban middle-class....

    Was he real? Did I really hear him sitting on the grounds of Khare-mandir, Miraj?

    ReplyDelete
  3. '' हिंदू जातीयवाद्यांचे सर्वांत मोठे समूह निधर्मीपणाचा बुरखा पांघरून सेक्युलर पक्षांतच ठाण मांडून बसलेले आहेत!'' जेब्बात...
    ''मुस्लिम समाजात परिवर्तन होत नाही, याचे मुख्य कारण हे आहे की, हिंदू समाजातील सेक्युलर नेतृत्वही परंपरेने चालत आलेल्या परंपरावादी नेत्यांच्याच हातात आहे!''...मस्त झालंय खूप...जियो...

    ReplyDelete
  4. तुम्ही विजेता झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन व खरोखर खूप सुंदर लेख आहेत . असे लिखान सदैव चालू ठेवा हि विनंती .

    ReplyDelete
  5. जे आहे ते वाईट आहे हे सांगायला "कुरुंदकर"च कशाला हवे? अश्या चर्चा तर रोज रंगतात.
    काय करायला हवे हे कोण सांगणार?

    ReplyDelete