Thursday 10 January 2013

काश्मीरसंबंधीची बातमी व आइन्स्टाईनचं पत्र

काश्मीरमधल्या ताज्या घडामोडींसंबंधी 'द हिंदू'मधे आलेल्या प्रवीण स्वामी यांच्या बातमीचा गोषवारा :

११ सप्टेंबर २०१२ या दिवशी सत्तर वर्षांच्या रेष्मा बी व त्यांचे पती इब्राहिम लोहार यांनी आपल्या मुलांसोबत उर्वरित आयुष्य घालवण्याच्या हेतूने पाकव्याप्त काश्मीरमध्ये गुप्त रितीने प्रवेश केला. सीमेवर माणसांची बेकायदेशीर ये-जा करण्यास सहाय्य केल्यासंबंधी चौकशीला सामोरं जावं लागू नये म्हणून काही वर्षांपूर्वीच त्यांच्या मुलांनी व नातवंडांनी पाकव्याप्त काश्मीरमधे मुक्काम हलवला होता. त्यानंतर बरीच वर्षे रेष्मा बी व त्यांचे पती भारतीय हद्दीतील चरोंदा इथेच राहात होते, पण आता शेवटच्या काळात मुलांसोबत राहाण्याची ओढ वाटून ती दोघं तिकडे गुप्त रितीने रवाना झाली.

या घटनेमुळे सावध होत गावकऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ असलेल्या चरोंदा भागात बंकर बांधणी सुरू केली.

भारत व पाकिस्तान यांच्यातील २००३च्या शस्त्रसंधी करारातील अटींचा भंग या बांधकामामुळे होत असल्याची सूचना पाकिस्तानी सैन्याने ऑक्टोबरमधे केली. परंतु भारतीय सैन्याने या बांधकामाच्या बाबतीत माघार घेण्यास नकार दिला. 

यानंतर पाकिस्तानकडून तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. यात भारतीय सैन्याची हानी झाली नाही, पण मोहम्मद शफी खताना (वय - २५ वर्षं), शहिना बानो (वय - २० वर्षं) आणि नववीत शिकणारा एक विद्यार्थी लिआकत अली यांचा मृत्यू झाला.

यानंतर गेल्या वर्षअखेरीस अनेक वेळा या नवीन बंकरकडे जाणाऱ्या सैन्यावर अनेक वेळा गोळीबार होत होता. यावर ६ जानेवारीला रात्री भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात एक पाकिस्तानी सैनिक ठार झाला तर एक गंभीररित्या जखमी झाला. या दिवशी भारतीय सैन्याने सावनपत्र भागातील आपल्या तळावर हल्लाही केल्याचा पाकिस्तानचा दावा आहे, पण तो भारतीय सैन्याने फेटाळलाय.

यानंतर पाकिस्तानी सैन्यानेही आणखी आक्रमक पावित्रा घेतला आणि नंतर ८ जानेवारीला दोन भारतीय जवानांना प्राण गमवावे लागले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा गोष्टी पूर्वीही झालेल्या आहेत, गेल्याच वर्षीही अशीच एक घटना घडली होती, त्यात करनाह इथे दोन भारतीय सैनिकांची गळा चिरून हत्या करण्यात आली आणि नंतर भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरात अनेक पाकिस्तानी सैनिकांचे प्राण गेले.

काही वेळा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एकीकडे लढाई सुरू असताना दुसरीकडे सौहार्दाचे कार्यक्रम सुरू आहेत असंही घडलेलं आहे. सप्टेंबर २००९मध्ये ईदनिमित्त पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना मिठाई दिली, त्यावेळी कृष्ण घाटी परिसरात व पारगवाल भागात दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये गोळीबार सुरू होता.

- असं बातमीत म्हटलेलं आहे.  
***
 

अल्बर्ट आइन्स्टाईन
पहिलं महायुद्ध (१९१४-१९) झाल्यानंतर आणि दुसरं महायुद्ध (१९३९-४५) व्हायच्या आधी (१९३१-३२च्या दरम्यान) अल्बर्ट आइन्स्टाईनने सिग्मंड फ्रॉईडला (सार्वजनिक कारणांसाठी) पाठवलेलं पत्र :

श्री. फ्रॉईड यांस,

लीग ऑफ नेशन् आणि इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटेलेक्च्युअल को-ऑपरेशन (पॅरिस) यांनी मला सूचना केली की, माझ्या मतानुसार एखादी समस्या निवडून त्यावर मोकळेपणाने मत मांडण्यासाठी मी एखाद्या व्यक्तीला निमंत्रित करावं. या सूचनेचं स्वागत करत चालू परिस्थितीत मानवी संस्कृतीला असलेल्या सगळ्यांत भयंकर समस्येवर तुमच्याशी चर्चा करण्याची संधी घ्यायचं मी ठरवलं. समस्या अशी आहे : युद्धाच्या संकटापासून मानवाची सुटका करण्याचा काही मार्ग आहे का? आधुनिक विज्ञानातील प्रगतीनंतरच्या काळात मानवी संस्कृतीच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनलेली ही समस्या आहे हे आता सर्वज्ञात आहे. आणि यावर उपाय शोधण्यासंबंधात कितीही उत्साह दाखवून झाला असला तरी उपायाचे सर्व प्रयत्न दुःखद रितीने मोडून पडले.

या समस्येवर व्यावसायिकतेने आणि व्यावहारिकतेने उपाय शोधण्याची कामगिरी ज्यांच्यावर आहे त्या लोकांना या बाबतीतली स्वतःची अकार्यक्षमता तीव्रतेने जाणवायला लागलेय. आणि त्यामुळेच काहीसं लांबून समस्येकडे पाहिल्यामुळे येणारा दृष्टीकोन ज्यांना लाभलाय अशा विज्ञानात गढलेल्या व्यक्तींकडून मतं मागवावीत असं या लोकांनी ठरवलं असावं असं मला वाटतं. माझ्यापुरतं बोलायचं तर, माझ्या विचारांची सर्वसाधारण प्रक्रिया मानवी इच्छाशक्ती आणि भावनांच्या काळोख्या जागांबद्दल काही शोधू शकत नाही. त्यामुळे या समस्येबाबत काही प्राथमिक प्रश्नांबद्दल माहिती करून घेण्यापलीकडे मी फार काही करू शकत नाही. म्हणूनच माणसाच्या भावनांबद्दलच्या तुमच्या ज्ञानाचा काही प्रकाश या समस्येवर पडावा आणि त्यातून काही उपायांची पूर्वतयारी करता येते का ते पाहावं या हेतूने मी लिहीत आहे. काही मानसिक अडथळे असे आहेत की जे सामान्य माणूस आपल्या पातळीवर काही प्रमाणात सोडवू शकेल, पण त्यातील आंतरसंबंध व गुंतागुंत त्याच्या लक्षात येईलच असं नाही; पण तुम्ही यावर काही मार्ग काढू शकाल. कदाचित राजकारणाच्या काहीसं बाहेरच असलेले हे अडथळे मार्गी लावण्यासंबंधी तुम्ही काही सुचवू शकाल.

राष्ट्रवादाच्या पूर्वग्रहापासून सुटकेच्या दृष्टीने आणि या समस्येच्या वरकरणी प्रशासकीय बाजूला तोंड देण्यासाठी मला एक उपाय दिसतो : आंतरराष्ट्रीय मतांनुसार एक न्यायिक संघटना उभारावी जिच्यामार्फत राष्ट्रांमधील संघर्षांमधे मध्यस्थी केली जाईल. या संघटनेच्या सूचनांचे पालन प्रत्येक देशाला बंधनकारक असेल, प्रत्येक वादावर या संघटनेने दिलेला निर्णय अमलात आणावा लागेल, तिने दिलेला निकाल मान्य करावा लागेल. पण इथे मला आणखी एक अडथळा दिसतोय : ही माणसांचीच संघटना असणार, त्यामुळे निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी तिची स्वतःची ताकद कमी पडण्याची शक्यता आहे आणि मग बाहेरच्या शक्तींचा दबाव वाढेल. या गोष्टीकडे लक्ष द्यायला लागेल; कायदा आणि सत्ता अपरिहार्यपणे हातात हात घालूनच चालतात. (पण) न्यायिक निर्णय आदर्श न्यायाच्या जवळपास जाऊ शकतात, अर्थात ज्या समुदायाच्या मागणीवरून हा न्याय दिला जातो त्याने त्याच्याशी बांधील असणं यासाठी गरजेचं आहे. सध्या तरी निर्विवाद निकाल देऊ शकेल अशा आंतरराष्ट्रीय संघटनेचं अस्तित्त्व कुठे दिसत नाहीये. त्यामुळे मी माझं पहिलं म्हणणं मांडतो : आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी प्रत्येक राष्ट्राची काही प्रमाणात विनाअट शरणागती - कृतीस्वातंत्र्यासंबंधीची (अधिक तपशिलात, सार्वभौमत्त्वासंबंधीची) - आवश्यक आहे. अशा सुरक्षेसाठी याशिवाय दुसरा मार्ग असू शकत नाही.

गेल्या दशकात यासंबंधी करण्यात आलेले सर्व प्रयत्न प्रामाणिक असूनही अपयशी ठरले यावरून त्यांना अयशस्वी करणारे काही गंभीर मानसिक मुद्दे यामध्ये आहेत हे निश्चित. यातील काही मुद्दे शोधणं अवघड नाही. प्रत्येक राष्ट्रामधल्या सत्ताधारी वर्गामध्ये असलेली सत्तेची अभिलाषा राष्ट्रीय सार्वभौमत्त्वाला पडणाऱ्या कोणत्याही मर्यादेचा स्वीकार करणार नाही. राजकीय सत्तेची ही भूक बहुतेकदा दुसऱ्या एका गटाच्या मदतीने वाढीला लागते; हा दुसरा गट केवळ आर्थिक आकांक्षा बाळगणाऱ्यांचा असतो. प्रत्येक देशामध्ये लहानसा आणि निश्चित लक्ष्य असलेला असा गट असतोच, या गटात सामाजिक भान सुटलेल्या अशा व्यक्ती असतात ज्या युद्ध म्हणजे शस्त्रांचं उत्पादन आणि विक्री एवढंच पाहू शकतात. आपलं वैयक्तिक हित आणि वैयक्तिक मत्ता वाढविण्याचा भाग म्हणूनच ते अशा घडामोडींकडे पाहातात.

पण एकूण घडामोडींचा अंदाज येण्यासाठी हे वास्तव समजून घेणं म्हणजे फक्त पहिलं पाऊल आहे. त्यामागोमाग दुसरा प्रश्न उभा राहातो : या लहानशा गटाला बहुसंख्याकांची इच्छा वळवणं कसं शक्य होतं? आणि हे बहुसंख्याक म्हणजे असे लोक, ज्यांच्यावर युद्धाचा गंभीर परिणाम होणार असतो. (बहुसंख्याकांबद्दल बोलताना मी अशा सैनिकांबद्दलही बोलतोय ज्यांनी हल्ला हा संरक्षणाचा सर्वोत्कृष्ट मार्ग आहे या विश्वासाने युद्ध हे त्यांचं व्यवयासायाचं माध्यम म्हणून स्वीकारलेलं आहे.) याचं एक साधं उत्तर असं असू शकतं की, अल्पसंख्याक वर्ग (आत्ताच्या समस्येसंदर्भात, सत्ताधारी वर्ग) शैक्षणिक संस्था आणि माध्यमं ताब्यात ठेवून असतो, अनेकदा तर धर्मपीठंही त्याच्याच हाताखाली असतात. यामुळे त्या वर्गाला बहुसंख्याकांच्या भावना संघटित करण्याची आणि त्यांचा वापर करण्याची ताकद मिळते.

अर्थात हे उत्तरही पूर्ण उपायाकडे नेत नाही. यातून आणखी एक प्रश्न उपस्थित होतो : हे वर्ग लोकांना एवढं उसळवू कसं शकतात? अगदी आपला जीव देण्याचीही तयारी असण्याइतकी तीव्र भावना कशी निर्माण करू शकतात? याचं एकच उत्तर असू शकतं : माणसाला आतूनच द्वेष आणि विध्वंसाची हाव आहे. सुरळीत काळात ही भावना सुप्त स्वरूपात असते, पण काही विशिष्ट वेळी ती उचल खाते. अशी भावना कार्यरत आहे असं म्हणून ती सार्वजनिक मानसिकतेवर लादणं सोपं आहे, पण इथेच सगळ्यात गुंतागुंतीचा मुद्दा आहे आणि त्याबद्दलच आपल्याला बोलायचंय. मानवी भावनांचा तज्ज्ञच त्याबद्दल बोलू शकेल.

यातूनच आपण आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे आलोय. द्वेष आणि विध्वंसाच्या भावनेपासून दूर नेण्यासाठी माणसाची मानसिक उत्क्रांती नियंत्रित करता येईल अशी काही शक्यता आहे का? यात मी फक्त तथाकथित असांस्कृतिक लोकांबद्दल बोलतोय असं अजिबातच नाहीये. उलट अनुभव असं सांगतो की, तथाकथित 'विचारवंत' अशा विध्वंसक वृत्तीमध्ये जास्त सहभागी असतात, कारण त्यांचा जमिनीवरच्या खडतर जीवनाशी थेट संबंध नसतो, ते मुख्यत्त्वे छापील पानांतून अशा परिस्थितीशी संबंध ठेवून असतात.

समारोप करताना मला सांगावंसं वाटतं की, आत्तापर्यंत मी राष्ट्रांमधल्या युद्धांबद्दलच बोललो. पण मला माहीत आहे की, आक्रमक भावना इतर पातळ्यांवरही आणि इतर परिस्थितींमध्येही कार्यरत असते. (उदाहरणार्थ, यादवी युद्ध. धार्मिक - वांशिक कारणांनी उसळणारे दंगे). पण माणसा-माणसामधल्या सर्वांत क्रूर आणि मोठ्या स्तरावरच्या या वादावरती बोलण्याचं मी मुद्दामहूनच ठरवलं. कारण कदाचित इथेच आपल्याला सशस्त्र युद्ध अशक्य करण्याचा मार्ग सापडू शकेल.

या तातडीच्या समस्येवर उपायाच्या दृष्टीने तुमच्या लिखाणात काही उत्तरं सापडतील असं मला वाटतं. पण तुमच्या काही नवीन संशोधनाच्या प्रकाशात तुम्ही जगाच्या या समस्येवर काही भाष्य केलंत तर ते आपल्या सगळ्यांनाच उपकारक ठरेल. यातूनच कदाचित नवीन आणि फलदायी कृतींची सुरुवात होऊ शकेल.

आपला विश्वासू,
ए. आइन्स्टाईन

('व्हाय वॉर?' या पुस्तिकेतून)

***

टीप : आइन्स्टाईनच्या या पत्रानंतर सहा वर्षांनी दुसरं महायुद्ध घडून गेल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली (१९४५).
***

काश्मीर. (फोटो : स्टीव्ह मॅकरी - मॅकरींनी कॅमेऱ्यात गोठवलेलं काश्मीर)

***

2 comments:

  1. कोणत्याही मुद्द्याकडे बघण्याचा वेगळाच दृष्टीकोण मिळतो, रेघेवरच्या अशा पोस्ट वाचल्या की. thanks.

    ReplyDelete
  2. 'द्वेष आणि विध्वंसाच्या भावनेपासून दूर नेण्यासाठी माणसाची मानसिक उत्क्रांती नियंत्रित करता येईल अशी काही शक्यता आहे का?'पुढे काय झालं, उत्तर दिलं का फ्रॉइडनं?...मी फार आळशी आहे, उत्तर तुलाच विचारणार.;P...तू ज्या पद्धतीनं दोन वेगळ्या गोष्टींची सांगड घालतोस, ते काहीतरी वेगळा विचार देणारं असतं...फोटो फार अप्रतिम आहे...

    ReplyDelete