Friday 23 September 2011

माणूस नामका धरम्

- प्रकाश जाधव

रात धुंड्या दीस धुंड्या
पर कोन आयताच गवशा नय
पीर धुंड्या दरगा धुंड्या
पर होनी को किसने टाल्या नय
जुम्मेसे बैठ्या मह्यनेसे बैठ्या
पर हज का पानी आठ्या नय
खुद को धुंड्या माळरान धुंड्या
कोन पाक नजर गवशा नय
दीस भाय धुंड्या रात बेगम धुंड्या
पर माणूस नामका धरम गवशा नय

(`दस्तखत`मधून)

***

नोव्हेंबर १९५१ जन्म (मूळ गाव कोतवली, ता. खेड, जि. रत्नागिरी) नंतर मग मुंबईत शालेय शिक्षण. वणवण भटकंती, अफाट दारिद्र्य, मुंबईच्या जमिनीवरच्या नि पाताळातल्या वास्तवाशी परिचय. वर्तमानपत्रं टाकण्यापासून कित्येक काम केली, एअर इंडियात लोडर म्हणून नोकरी. दादर पुलाखाली ही गाजलेली कविता. १९७८ साली दलित साहित्य संसदेतर्फे दस्तखत हा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध. झक, मुर्दाबाद नावाचं शहर या कादंबऱ्या, असाही एक हिंदुस्तान नावाचं नाटक, काही कथा असं अजून काहीनाकाही लिहिलेलं. हिंदीतही कविता लिहिलेल्या. शिवाय चंद्रकान्त पाटील आदींनी काही मराठी कविता हिंदीत अनुवादित केलेल्या. साम्यवादी विचारांशी बांधिलकी. २००१ साली ब्रेनहॅमरेजच्या ऑपरेशननंतर स्मृती हरवली. २९ जुलै २०११ला निधन.

(वर दिलेला मजकूर 'प्रतिशब्द प्रकाशन' (मुंबई) व  ना. धों. महानोर नि चंद्रकान्त पाटील यांनी संपादित केलेल्या 'पुन्हा एकदा कविता' यांच्या मदतीने आहे.)

***
ही भाषा कोण्या एका धर्माची नाही, पंथाची नाही. सगळी नैतिक, अध्यात्मिक बंधने झुगारून तथाकथित लोकांच्या मर्यादित जगापलीकडे जगत असलेल्या एका असंतुष्ट समूहाची ती भाषा आहे. दस्तखतमधील कविता या समूहाचे प्रतिनिधित्व करतात. – अर्जुन डांगळे (दस्तखतची प्रस्तावना)

No comments:

Post a Comment