Friday 15 May 2015

गांधी मला भेटणार होता, पण दुर्दैवानं आपल्याकडं वेळ फार थोडा आहे!

गांधी मला
वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या १० x १२च्या खोलीत
६ x २ १/२च्या बाजल्यावर
भारतीय जनतेच्या प्रतीकांत भेटला
तेव्हा तो म्हणाला-
सत्यापासून सौंदर्य वेगळे असू शकत नाही
सत्य हेच सौंदर्य आहे. त्या सत्याच्या द्वारा मी सौंदर्य पहातो
सत्याचा आग्रह ठेवल्यामुळेच तडजोड करण्यात
असलेल्या सौंदर्याचे मोल जाणता येते
सत्य हे वज्राहुनही कठोर आणि कुसुमाहूनही कोमल आहे
- या ओळींपासून सुरू होणाऱ्या 'गांधी मला भेटला' या वसंत दत्तात्रेय गुर्जरांच्या कवितेवरची बंदी आता सर्वोच्च न्यायालयानंही कायम ठेवली आहे. (न्यायालयाच्या निकालाची प्रत) कवितेच्या ज्या प्रकाशनावरून (बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज युनियन, औरंगाबादचं 'बुलेटिन') न्यायालयात खटला सुरू होता, त्या प्रकाशनाचे प्रकाशक म्हणून लातूरचे देविदास तुळजापूरकर यांना न्यायालयात माफी मागावी लागली आणि मग खटला मिटला, असं यासंबंधी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून कळतं. (शिवाय, मुळात कवितेपेक्षाही या सगळ्या घडामोडींना समांतर असा आणखी एक संदर्भ असल्याचंही बोललं जातं. बँक ऑफ महाराष्ट्रनं विजय मल्ल्या यांच्या 'किंगफिशर' या कंपनीला दिलेल्या कर्जाच्या व्यवहारामध्ये काळंबेरं असल्याचा आरोप २०१२ साली झाला होता. हा आरोप तुळजापूरकर यांच्या 'जागलेपणा'मुळं झाला असल्याच्या संशयावरून बँकेनं वेगळी कुरापत काढून या कवितेवरून त्यांच्यावर कारवाईची तयारी केल्याची बातमीही दोन वर्षांपूर्वी 'द हिंदू' या वर्तमानपत्रात आली होती. (सुधारीत माहिती- संघटनेने संपाची हाक दिल्यावर या कारवाईचा धोका टळल्याची माहिती तुळजापूरकर यांनी फोनवरच्या बोलण्यात रेघेला दिली.) अर्थात, कवितेवर खटला सुरू झाल्यानंतर बराच काळ गेल्यावरची ही घडामोड आहे आणि आपण आपल्या बळावर त्याचा आणखी काही तपास करू शकलेलो नाहीयोत, त्यामुळं त्यावर काही बोलता येणार नाही. बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज युनियनच्या नियतकालिकात कविता छापून आली तेव्हा तुळजापूरकर त्याचे संपादन करत होते व संघटनेची प्रशासकीय जबाबदारीही त्यांच्याकडं होती. ही संघटना ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनला संलग्न आहे, त्यामुळं खटला शिखर संस्थेतर्फे चालवला जात होता).

सध्या, प्रकाशकांची या खटल्यातून मुक्तता झाली असली, तरीही या कवितेतून गांधीजींची बदनामी झालेली नाही, हे सिद्ध करण्याची जबाबदारी कवी वसंत गुर्जर यांच्यावरच असल्याचंही न्यायालयानं म्हटलंय. आणि त्यासंदर्भातील पुढील कामकाजासाठी खटला लातूरमधल्या सत्र न्यायालयाकडं वर्ग केला आहे. यासंबंधी काही तपशील पुढील बातम्यांमधून मिळू शकतो: महाराष्ट्र टाइम्सलोकमत लोकसत्ता डीएनए.

वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या (आणि वर ज्यांच्या लिंक दिल्या आहेत त्या सर्व) बातम्यांमध्ये कवीला अजूनही यासंबंधी पूर्ण दिलासा मिळाला नसल्याचं म्हटलं असूनही वृत्तवाहिन्यांमध्ये मात्र खटला संपून चर्चा सुरू झालेल्या दिसल्या. १४ मे रोजी दोन वाहिन्यांवर यासंबंधी रात्रीच्या चर्चा झालेल्या दिसतात. आणखी कुठं असल्यास या नोंदीत दुरुस्ती करावी लागेल. यातल्या 'जय महाराष्ट्र' या वाहिनीनं विषय काय ठेवला, तर: का होते महापुरूषांची बदनामी?

'जय महाराष्ट्र'च्या फेसबुक पानावरून

या चर्चेच्या शेवटी, साहित्यिकांनीही महापुरुषांची बदनामी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, या आशयाचं वाक्य संबंधित अँकरांनी म्हटलं, पण या चर्चेचा व्हिडिओ इंटरनेटवर आपल्याला न सापडल्यामुळं त्याबद्दल आपण अधिक काही इथं नोंदवत नाहीयोत. तरीही मुळात चर्चेच्या विषयावरूनही एवढं स्पष्ट होतंच की, 'गांधी मला भेटला' या कवितेनं बदनामी झाल्याचं न्यायालयाचं मत मान्य करून, मग अशी एकुणातच महापुरुषांची बदनामी का होते, असा काही जाब विचारण्याची जबाबदारी वाहिनीनं अंगावर घेतलेली आहे.

'एबीपी माझा' वाहिनीवर यासंबंधी झालेल्या चर्चेतही काही गोष्टी कळतात. एक तर, कवितेचं नाव 'गांधी मला भेटला होता' असंही असू शकेल, असं मधे मधे पडद्यावर दिसणाऱ्या शब्दांवरून कळत होतं. शिवाय, या चर्चेचं शीर्षक होतं- 'कवितेच्या वादात 'गांधी' हरले की जिंकले?' हे तसं फारच महत्त्वाकांक्षी शीर्षक आहे, त्यामुळं आपल्यासारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांना त्याचं उत्तर मिळू शकत नाही, हेही या चर्चेतून कळलं. 

कविता अश्लील-बीभत्स असण्यासंदर्भात, या चर्चेतील सहभागी व्यक्तींपैकी महेश केळुसकर, या कवितेच्या बाजूनं काही म्हणणं मांडतात. दुसरे, समर खडस शेवटी उपरोधानं म्हणतात की, आपण तुकारामाचे अभंगही कोर्टात नेऊ, ते अभंगही बॅन करू, भैरप्पांच्या पर्व कादंबरीत श्रीकृष्णापासून अनेक लोक गोमांस खाताना दाखवले आहेत, अशी एक आपण यादी करू व ते सगळं बॅन करू आणि मग टिनटिन, फॅन्टम अशाच पुस्तकांचा प्रसार करूया.

यू-ट्युबवरील व्हिडिओतील चित्र : एबीपी माझा वाहिनी

आणि त्यानंतर चर्चेचा शेवट करताना अँकर व्यक्ती म्हणाली की, ''आपल्याकडे वेळ फार कमी आहे दुर्दैवाने, परंतु अत्यंत हा मोठा विषय आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य की स्वैराचार, त्यामधला बॅलन्स आपल्याला साधायचा आहे, अनेक मुद्दे आपल्या मान्यवरांनी मांडले होते, अनेक कवितांचा आणि लेखांचा दाखला आपल्याला देण्यात आला, खरं तर दुसरा मुद्दा असाही असू शकतो की यातले काही अभंग किंवा कविता शालेय पाठ्यपुस्तकातसुद्धा नाहीयेत, हेसुद्धा आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाहीये, त्यामुळे जे आपल्या मान्यवरांनी मुद्दे मांडलेले आहेत ते त्यांच्या त्यांच्या परीने अत्यंत महत्त्वाचे आहेत, योग्य की अयोग्य याविषयी वेगळी चर्चा होऊ शकते, आजच्या या चर्चेसाठी आपल्याला या सर्व मान्यवरांनी वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे आभार, माझा विशेषमधे आज इथेच थांबतोय, बघत राहा एबीपी माझा.''

तर, आधीच्या एका मान्यवरांनी ज्याबद्दल उपरोधानं काही बोलू पाहिलं, त्यावर पाणी फिरवून पुन्हा आपल्याला असंच सांगण्यात येतं की, 'काही साहित्य शालेय पाठ्यपुस्तकातसुद्धा नसतं, याकडं आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही!' यावरून काय सिद्ध होतं ते आपल्याला कळू शकत नाही. शालेय पाठ्यपुस्तकात येईल, असंच साहित्य असायला हवं, असा काही सूर आहे काय, तेही कळत नाही. आणि मुळात सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी मांडलेले मुद्दे त्या त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत आणि योग्य की अयोग्य यावर वेगळी चर्चा करता येईल, त्यामुळं मुद्दा लटकता ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे, यावरच आजची चर्चा थांबू शकते. तुम्ही पाहात राहा--

आता आज जशा वृत्तवाहिन्या आहेत, तशा काही ही कविता कवीनं लिहिली तेव्हा नव्हत्या, तरीही कवीनं कवितेचं दुसरं कडवं काय लिहिलं पाहा:
गांधी मला
आकाशवाणी मुंबई ब केंद्राच्या
५३७.६ किलोसायकल्सवर
गांधीवंदना या कार्यक्रमात भेटला
तेव्हा तो बोलला-
महात्म्याचे वचनदेखील बुद्धीच्या कसोटीवर घासून घ्या
आणि ते कसास न उतरल्यास त्याचा त्याग करा
आकाशवाणीच्या निवेदिकेनं सांगितलं-
गांधीवंदना हा कार्यक्रम आपण
६ वाजून ५५ मिनिटं ते ७ वाजून २ मिनिटंपर्यंत
तांत्रिक बिघाडामुळे ऐकू शकला नाहीत
त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत
म्हणजे या सगळ्या माध्यमांच्या व्यवहारातलं तांत्रिक महत्त्व तेव्हा कवीच्या डोक्यात गच्चकन घुसलं असेल असंही असेल. शेवटी कवी पडला १० बाय १२च्या खोलीत राहणारा सर्वसाधारण इसम. यात निवेदिकेचा दोष नाही. काही असेल प्रॉब्लेम तर मूळच्या रचनेत असेल. हेच वृत्तवाहिन्यांना पण लागू होईल का? रचनेचं काही शोधावं वाटलं, तर बरं. नायतर व्यक्तिगत अँकरांची टिंगल केल्यासारखं होईल, आपला तो हेतू नाही, पण तसं ओझरतं होत असेल तर ती रेघेची चूक. तर, हे सगळ्या विषयांवर तांत्रिक पातळी कायम ठेवण्याचं काम आता एवढं वाढलंय,  नि इकडं कवितेवर बंदी येतेय म्हणजे पाहात राहा आता-

आपण ज्याला कडवं असं म्हटलं, तसे ओळींचे चाळीस पुंजके या कवितेत आहेत. त्यातले दोन उदाहरणादाखल आपण दिले. वास्तविक आजूबाजूच्या वास्तवातून काही घटना पाहिल्या की त्यातला एकेक पुंजका वाचकांना आठवत जाऊ शकतो. काही नावं बदलतील, काही तपशील बदलतील, उदाहरण म्हणून हा अठ्ठाविसावा पुंजका पाहा:
गांधी मला
आम जनताकी संपत्ती असलेल्या पृथ्वीवर
बेवारस मुलांच्यात नवरा-बायकोचा खेळ करताना भेटला
तेव्हा तो म्हणाला
निधर्मी देशकी क्या पहचान!
छोडो चड्डी मारो गांड!
हा पुंजका तसा अजूनही कायम आहे. आत्ता परवाच नाही का देशाचे पंतप्रधान छत्तीसगढमधल्या बस्तरमधे जाऊन आले. आणि मग देशाची प्रगती, कोळशाच्या खाणी, असे काही मुद्दे निधर्मी बातम्यांमध्ये आले. चर्चा तर ऐकल्याच असतील तुम्हीही. तर हा पुंजका जसाच्या तसाच लागू होईल.

आणि त्या नंतरचा हा एकोणतिसावा पुंजका:
गांधी मला
हाजी मस्तानच्या साम्राज्यांत दिसला
तेव्हा त्यानं चक्क पंचा सोडला
त्याच्या पंच्यावर मी कधीच गेलो नाही
पंचा काय धोतर काय नि पटलून काय
सत्याचे प्रयोग कशातूनही होतात
हो
अगदी कवितेतूनसुद्धा
परवा 'दीवार' नावाचा चित्रपट लागला होता एका वाहिनीवर, तर त्यात मधे मधे काही पूरक माहिती सांगत-दाखवत होते, त्यात या चित्रपटातील हिरो अमिताभ बच्चन यांची अलीकडची काही मुलाखत थोडी थोडी दाखवत होते, त्यात मुलाखत घेणारी व्यक्ती अमिताभ यांना म्हणते, 'तुमच्या या व्यक्तिरेखेवर हाजी मस्तान साहेब यांचा प्रभाव असल्याचं म्हणतात, तर त्याबद्दल...' मग त्याबद्दल बोलणं होतं. असं आहे. मस्तान साहेबांचे प्रयोग किती महत्त्वाचे ठरलेत पाहा. आणि हे काय कवितेतून करतात काय माहीत!

आणि मग रोजच्यासारखे अग्रलेख वाचले कीसुद्धा ही कविता कोणाला आठवू शकते. कवितेतला एकोणचाळिसावा पुंजका पाहा ना:
गांधी मला
अत्र्यांच्या शिवशक्तीत
गांधीवर अग्रलेख लिहिताना दिसला
गांधीत अग्रलेख लिहिताना दिसला
गांधीत आम्ही ईश्वराचे दर्शन घेतले
धन्य झालो
अब्जावधी वर्षात आता ईश्वर पृथ्वीवर येणार नाही
स्वदेशी राहा-स्वदेश बना
असं म्हणून त्यांनी देशीला जवळ केलं
तर, अत्र्यांचे पत्रकारितेतले प्रयोगही अजून टिकून आहेत. म्हणजे हजार वर्षांना पुरून उरेल असा आत्मविश्वास, जमेल तेवढी समोरच्याला व्यक्तिगत पातळीवर हलक्यात काढणारी भाषा, हे सगळं कायम आहे. फक्त वृत्तपत्रंच नाही, तर वृत्तवाहिन्यांनीही ते प्रयोग कायम ठेवलेत असं आपलं १० बाय १२ मत आहे. आणि रेघेचा विषय आहे म्हणून सारखं ते आठवत असेल. पण ते तितकंसं महत्त्वाचं नाही. मुद्दा आहे तो, आता कवीवरचा आरोप अजूनही कायम आहे, त्यावर काही मत आहे काय आपलं? तर, रेघेपुरतं मत एवढंच की, या कवितेत गांधीजींची बदनामी झालेली नाही आणि ही कविता बीभत्स किंवा अश्लील नाही. न्यायालयानं निकाल दिलाय म्हणून आणि कवीला अडचणीत आणणं बरोबर नाही म्हणून, आपण ही कविता इथं पूर्ण देत नाहीयोत. तरीही आपल्या सगळ्यांना वाचक म्हणून यावर काही बोलता यावं एवढ्यापुरतं दाखला म्हणून काही पुंजके जोडलेत, त्यातून काही कायदेभंग झाला असेलच, तर तो सविनय आहे.

तर, या सगळ्या चर्चेच्या शेवटी मग गांधीजींचं काय झालं? ते कवीला भेटले असा दावा केलाय कवीनं, तर मग आपल्याला भेटणार होते, असं नोंदीच्या शीर्षकात लिहिलंय त्याचं काय झालं?
गांधीबाबा राजघाटावर
वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या
खांद्यावर हात ठेवून म्हणाला-
देव मेला आहे देवमाणूसही मेला आहे
आता सैतानांच्या विश्वात मेलेल्या देवाला मुक्ती नाही
आणि देवमाणसाला तर नाहीच नाही
असं सगळं असताना, आत्तापर्यंत या खटल्यात मानसिक काही त्रास झाला असला तरी कवीला आर्थिक आणि शारीरिक तोशीस पडलेली नाही, असा उल्लेख आपण मागं एका नोंदीत केला होता. आता कधी लातूरच्या कोर्टात सुनावणी होईल तेव्हा कवीला आपल्या कवितेचं समर्थन करायला जावं लागेल, तोपर्यंत तुम्ही गुर्जरांना याबद्दल काही विचारलंत, तर ते म्हणतील- हो हो सगळं ती संघटनाच बघतेय (बँक कर्मचारी संघटना), तर आता ते सांगतील, वकील सांगतील तेव्हा कोर्टात जायला लागेल, तोपर्यंत काय नाय काय नाय त्रास. आणि हसतील!

No comments:

Post a Comment