Thursday 15 August 2013

१५ ऑगस्ट, ए. के. हंगल व हसणं

आज १५ ऑगस्ट. आजच्या दिवशी आपण एका पुस्तकाच्या मदतीने नोंद करणार आहोत. 'माझ्या आठवणी' हे अभिनेते ए. के. हंगल यांचं आत्मचरित्रपर असं लहानसं पुस्तक आहे. एकशेएकवीस पानांचं. या पुस्तकातला काही मजकूर निवडून खाली नोंदवलाय. यातून आपसूक हंगलच का नि त्यांचं हे पुस्तकच का हे स्पष्ट होईल असं वाटतं. म्हटलं तर सुट्या सुट्या, म्हटलं तर एकसंध अशा आठवणी नोंदवल्यात फक्त हंगलांनी. आपण त्यातही आणखी थोडका मजकूर निवडून इथे काही बिंदू नोंदवू पाहतोय. कसले बिंदू? पाहा खालच्याच मजकुरात काही उत्तर आहे काय ते-
***

लोकवाङ्मय गृह. । दुसरी आवृत्ती : ऑगस्ट १९९९
अनुवाद : वैशाली रोडे । मुखपृष्ठ : कमल शेडगे
हंगलांच्या पुस्तकाबद्दल नोंद का, याचा एक बारका बिंदू पुस्तकाच्या 'मनोगता'मध्ये मिळेल. तिथे हंगल म्हणतात :
तारखा वगैरेंच्या बाबतीतही मी तसा कच्चाच आहे. एक अभिनेता म्हणून मला लोकांमध्ये, त्यांच्या स्वभावात, त्यातल्या बारकाव्यांत जास्त रस आहे. मला माझी स्वतःची जन्मतारीखही माहीत नाही. १५ ऑगस्ट ही माझी जन्मतारीख म्हणून लावली गेली आहे, पण एका विशिष्ट प्रसंगामुळे ती तारीख मला चिकटली. आणि थोडाफार स्वातंत्र्यसैनिक असल्यामुळे मीही ती तशीच राहू दिली. वाचकांना यात काही चुका आढळल्या तर त्यांनी मला त्या निःसंकोचपणे कळवाव्यात. मी त्यांचा आभारीच राहीन.
हा परिच्छेद जसा आहे, तसंच पुस्तकाचं स्वरूप आहे. कधी संकोचत, कधी देशसेवा नावाच्या गोष्टीबद्दल ढोबळ वाटेल असं काही बोलत, प्रामाणिकपणे हंगलांनी त्यांच्या आठवणी नोंदवल्यात. कधी तुटकपणे, कधी आधी सांगितलेलं जरा परत सांगितलं जातंय, असं हे पुस्तक उभं आहे. यातल्या हंगलांच्या लहानपणीच्या परिसरासंबंधीच्या आणि शाळेच्या काळातल्या आठवणींमधले काही बिंदू एकदम थोडक्यात इथे आपल्या चित्रासाठी नोंदवूया :
पेशावर :
माझे आजोबा प्रथम पेशावरला आले. आमचे पूर्वज काश्मिरी पंडित. काश्मिरी भाषेत 'हंगल' म्हणजे हरीण, काळवीट. आमचे पूर्वज कित्येक शतकं काश्मीर सोडून लखनौला राहतायत. पं. दया किशन हंगल जवळ जवळ दीडशे वर्षांपूर्वी लखनौहून पेशावरला आले.

'पारसी थिएट्रिकल कंपनी' पेशावरला आली आहे हे ऐकलं की आम्हाला कोण आनंद व्हायचा! ही गावोगावी फिरून संगीत नाटकं करणारी नाटक मंडळी होती. त्या वेळचे सुप्रसिद्ध नाटककार आगा हशर काश्मिरी आणि नारायण प्रसाद 'बेताल' यांनी लिहिलेली ही नाटकं असायची. रात्रीची जेवणं आटोपून रात्री नऊच्या सुमाराला आम्ही नाटकाला जायचो, ते थेट पहाटेपर्यंत. कमीत कमी पाचेक तास नाटक चालायचं. तेही कशा स्थितीत? वीज नाही. त्यामुळे दिवेही नाहीत आणि मायक्रोफोनही नाहीत. नट मेकअपचे जाड थर चेहऱ्याला लावायचे. कोण बरा दिसतोय, कोण नाही, हेही ओळखू येणं कठीण. नाटकातल्या स्त्री-भूमिकाही पुरुष नटच करायचे. स्त्रिया अजून रंगभूमीवर काम करायला लागल्या नव्हत्या. प्रेक्षकांना एखादं गाणं किंवा एखादा प्रसंग आवडला की, 'वन्स मोअर' मिळायचा. ते गाणं किंवा प्रसंग मग कलाकारांना पुन्हा करावा लागायचा. एकही नवीन नाटक आम्ही चुकवलं नाही. मी नेहमी पुढच्याच रांगेत बसायचो आणि उत्सुकतेने शुद्ध उर्दूतले यमकयुक्त संवाद आणि मधुर गाणी ऐकायचो.

शाळा :
माझं प्राथमिक शिक्षण पेशावरला झालं. तेव्हा आणि अजूनही पेशावर ही वायव्य सरहद्द प्रांताची राजनाधी आहे.

हा प्रदेश मुख्यतः शेतीप्रधान. वायव्येकडे अफगाणिस्तानचे डोंगर आणि पूर्वेकडे पंजाबची सुपीक जमीन यांच्यामध्ये वसलेला. पण तिथे सतत युद्धं व्हायची. काही विशिष्ट भागांमध्ये तिथल्या मूळ लढाऊ रहिवाशांची वस्ती होती. कोणत्याही सत्तेविरुद्ध शस्त्रानिशी ते उभे ठाकायचे. मोगल, शीख, इंग्रज यांना त्यांनी प्रतिकार केला होता. अलीकडे काही वर्षं, हाच भाग अंमली पदार्थ, शस्त्रास्त्रं यांच्या बेकायदेशीर व्यापारासाठी कुप्रसिद्ध आहे. पेशावरपासून काही मैलांवर असलेल्या दरी या गावी स्वयंचलित रिव्हॉल्वर, ३.३ बोअर रायफली आणि अत्याधुनिक बनावटीच्या 'कनाश्निकोव्ह' मिळतात. या अत्याधुनिक स्वयंचलित शस्त्रांसारखीच शस्त्रं बनवण्याचं कौशल्यही इथल्या लोकांनी मिळवलंय. अफगाणिस्तानातल्या यादवी युद्धापासून इथली परिस्थिती फारच बिघडली आहे.

पेशावर हे तटबंदी असलेलं शहर. रात्री ब्रिटिश छावण्या आणि शहर यांच्यामध्ये असणारे दरवाजे बंद व्हायचे. शहरात बहुसंख्य लोक मुसलमान होते, पण हिंदूही बरेच होते. हिंदू-मुस्लिम सलोख्याने रहायचे.

०००

आता मी 'खालसा हायस्कूल'मध्ये जायला लागलो होतो. दोन शीख भाऊ ही शाळा चालवत. इथे ब्रिटिशांचं अस्तित्व अधिकच जवळून जाणवायचं. आमच्या शाळेच्या समोरच महाराजा रणजितसिंगांनी बांधलेला 'किल्ला बाला हिरसार' हा किल्ला होता. या किल्ल्यात आता ब्रिटिश सैन्याचा तळ होता.

या शाळेत मी शीख धर्मातल्या काही गोष्टी शिकलो. रोज सकाळी वर्ग सुरू होण्याआधी सामुदायिक प्रार्थना व्हायची. त्याला 'हरदास' म्हणत. ही प्रार्थना शीख गुरूंच्या काळात धर्मासाठी प्राणार्पण केलेल्यांच्या गौरवार्थ असायची.

०००

मी कधीच फार हुशार नव्हतो. गणितात तर माझा भोपळा ठरलेलाच. खरं तर वडिलांनी खास गणितासाठी मला खासगी शिकवणी ठेवली होती. पण ते सरच बिचारे माझा गृहपाठ करून द्यायचे!

माझा एक विषय चांगला होता, तो म्हणजे उर्दू. घरी आम्ही उर्दूच बोलायचो. उत्तर भारतात हिंदू आणि मुस्लिम दोघंही उर्दूच बोलतात. शहरातल्या उच्च आणि मध्यमवर्गीयांची ही भाषा. खेड्यापाड्यातले लोक मात्र त्यांच्या त्यांच्या बोलीभाषांचा वापर करतात. घरातल्या बायकाही जास्त करून हिंदीच बोलतात. कारण धर्मशास्त्र आणि धार्मिक गीतं याच भाषेत आहेत. आजोबांना पर्शियन भाषाही यायची. कारण एकेकाळच्या राज्यकर्त्यांची, मोगलांची ती सरकारी कामकाजाची भाषा होती.

आजही मी उर्दूच बोलतो. माझ्या व्यवसायातही उर्दूच वापरतो. माझ्या चित्रपटातले संवाद मी उर्दू लिपीत लिहून घेतो. कारण हिंदी वाचणं, लिहिणं मला कठीण वाटतं. मला शाळेत कधीच हिंदी शिकवली गेली नाही.
***

आता आपण हंगलाच्या पुस्तकातल्या परिसरातून आपल्यात येऊ. वरती त्या पुस्तकातला जो मजकूर नोंदवला त्यात हंगलांच्या शाळकरी जीवनातलं काही आलंय. त्यांचं घराणं मूळचं कुठलं, त्यांचा धर्म, भाषा, आणि त्यांचा लहानपणचा परिसर, याचा थोडासा अंदाज त्यातून यावा. हंगल यांच्या जन्माचं साल १९१४ आहे. तेव्हाच्या हिंदुस्थानी परिसरातल्या एका भागाबद्दल ते बोलतायंत. त्यांच्या नजरेतून काही बोलू पाहातायंत. तेव्हा मॅट्रिक झाल्यानंतर घरच्या परिस्थितीमुळे हंगल टेलरिंगच्या कामात उतरले आणि संबंधित नोकरी करू लागले. दरम्यान, त्यांच्या वडिलांच्या निर्णयामुळे कुटुंबाने पेशावरहून कराचीला बाडबिस्तारा हलवला. तिथेही हंगल पोटापाण्याचं काम म्हणून टेलरिंग दुकान आणि स्वतःची आवड म्हणून हौशी रंगभूमी अशा कामांमध्ये गुंतले. दरम्यान, दुसरं महायुद्धही झालं, त्या काळात त्यांना राजकीय जाणीवही तीव्रतेने झाली. देवाधर्मावरचा विश्वास उडाला, साम्यवादी विचारसरणीचं आकर्षण वाटून त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचं सदस्यत्वही घेतलं. टेलरिंग कामगारांच्या संघटनाचा प्रयत्न केला. असं त्यांचं त्यांचं बरं चाललं होतं. दरम्यान, भारत देशाचा कारभार भारतीय व्यक्तींच्या हाती सोपवून ब्रिटीश लोक निघून गेले, जाता-जाता भारतातून पाकिस्तान बाहेर आला, फाळणी झाली, इत्यादी सगळ्या गोष्टी. या काळात हंगल आपल्या कामगार संघटनाच्या कामामुळे तुरुंगात गेलेले, कराचीत. इकडे फाळणीमुळे निर्वासित झालेल्या मंडळींची प्रचंड ये-जा सुरू. फाळणीनंतर हिंदू नि मुस्लिम कैद्यांचीही देवाण-घेवाण करण्याचं ठरलेलं. त्यानुसार हंगल व त्यांच्या मित्रांना हिंदूपणा दाखवून तुरुंगातून सुटून भारतात जाण्याची संधी होती, पण त्यांना तेव्हा ते योग्य वाटलं नाही. पुढे नंतर १९४९मध्ये त्यांनी भारतात जायची तयारी दाखवली. मग त्यांना बारा तासांचा अवधी देऊन कराची सोडण्यास सांगण्यात आलं, त्यानुसार हंगल आपल्या बायको व मुलासह कराची बंदरावरून मुंबईला पोचले, अशा घडामोडी व संबंधित तपशील पुस्तकात येतो. कराचीच्या तुरुंगातला हंगलांनी नोंदवलेला एक प्रसंग आपण इथेही नोंदवू. न्यायालयीन सुनावणीच्या काळातला एक अनुभव आहे हा :
या सुनावणीच्या वेळी न्यायालयात नव्हे, तर न्यायालयाबाहेरच्या व्हरांड्यात मी एक धडा शिकलो.

माझी बायको माझ्यासाठी दुपारचं जेवण घेऊन आली होती. ती साडी नेसली होती. ते पाहून माझ्याबरोबर असणाऱ्या पोलिसाने विचारलं, 'तुम्ही मराठी आहात?'

'नाही. का बरं?'

'मी मराठी आहे. फाळणीच्या वेळी कुटुंबासकट स्थलांतर करून इथे आलो. मूळचा मी सातारचा.' तो म्हणाला. तिथल्या लोकांमध्ये इतकी वर्षं तो राहिला होता. त्यांच्याशी नातं जुळलं होतं. ते सर्व सोडून आता इथे आला होता. इथे त्याचं कोणीच नव्हतं. 'अक्षरशः रडतो हो आम्ही इथे!' तो सांगत होता.

आपण जिथे वाढतो, तिथेच आपली नाळ जुळलेली असते याचा मला प्रत्यय आला. धर्माच्या आधारावर नव्हे, तर असा मातीशी, या मातीतल्या लोकांशी जुळलेल्या नात्यावरच राष्ट्रं उभी राहत असतात. भाषा, संस्कृती, प्रदेश, इतिहास याला इथे महत्त्व असतं. हे समजण्यासाठी मार्क्सवादच वाचायला हवा असं नाही, सामान्य ज्ञानानेही हे कळू शकतं.
असा प्रसंग नोंदवलेले हंगल मुंबईत आल्यानंतर 'इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन'मध्ये (इप्टा), थोड्या राजकीय कामामध्ये, टेलरिंगच्या कामामध्ये असं स्वतःला गुंतवत गेले. रमत गेले. 'इप्टा' म्हणजे स्वतंत्र इतिहास आहे म्हणतात, त्याबद्दलही हंगलांनी लिहिलंय थोडक्यात. शंभू मित्रा, सलील चौधरी, उत्पल दत्त, मृणाल सेन, पंडित रविशंकर, भूपेन हजारिका, राजा राव, बलराज सहानी, हबीब तन्वीर, इत्यादी अनेक नावं या इतिहासात येतात. अमर शेख, शाहीर अण्णा भाऊ साठे अशा मराठी मंडळींचीही नावं हंगल घेतात. हा इतिहास आपल्या नोंदीत तसा समग्रपणे आणता येणं आपल्या मर्यादेत शक्य नसल्यामुळे तो ओझरता नोंदवून पुढे वळू.

हंगल मुख्यत्त्वे नाटकातलेच, पण पुढे ते आपसून चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिकांमध्ये जात गेले. त्यांना चित्रपट क्षेत्राबद्दल मनापासून जवळीक कधी वाटली नाही, असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे 'आज या क्षेत्रात इतकी वर्षं काढल्यावरही या जगाच्या आपण बाहेरच आहोत, असं मला कधी कधी वाटतं' असं ते लिहून गेलेत. तरी त्यांनी चित्रपटांमधून जी काही कामं केली, त्यात जी काही माणसं भेटली त्यांचे लहान-मोठे प्रसंग त्यांनी पुस्तकाच्या शेवटच्या भागात सुटे सुटे नोंदवलेत. त्यानंतर 'माझ्या चित्रपटांवर बंदी' असा एक लहानसा भाग आहे शेवटाकडेच, त्यात हंगलांनी जे लिहिलंय ते नोंदवून थांबू. हंगलांनी हे लिहिलंय :
१९९३मध्ये शिवसेनेचे नेते बाळ ठाकरे यांनी माझ्या चित्रपटांवर बंदी घातली. त्यांना माझ्याबद्दल काही चुकीची माहिती कळली होती. खरं घडलं ते असं-

मध्यंतरी मी माझ्या आत्मचरित्राचा कच्चा खर्डा तयार करत होतो. फाळणीच्या पूर्वी मी सीमेच्या त्या बाजूला माझ्या कुटुंबासह राहात होतो. तेव्हाच्या असंख्य घटनांचा पट झरझर माझ्या डोळ्यासमोरून सरकून गेला. १९४९च्या अखेरीला मी मुंबईत स्थायिक झालो. त्यानंतर मी तिथे गेलो नव्हतो. साहजिकच तिथे जाण्याची माझी तीव्र इच्छा होती. मला माझं जन्मगाव (सियालकोट) पाहायचं होतं, मी जिथे मोठा झालो, ते शहर (पेशावर) पाहायचं होतं. याच शहरातून मी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. जिथून मी कम्युनिस्ट चळवळीत सामील झालो आणि त्यामुळे दोन वर्षांचा कारावासही भोगला, त्या कराची शहरालाही मला भेट द्यायची होती. पन्नास वर्षांनी तिथे जाणं आणि ती-ती ठिकाणं पाहाणं यामुळेही मला आत्मचरित्र लिहायला मदत झाली असती.

या विचाराने मी पाकिस्तानच्या मुंबईतल्या उप-उच्चायुक्तांना फोन केला. त्यांच्या देशाला एकदा भेट देण्याची माझी इच्छा मी त्यांच्या कानावर घातली आणि व्हिसा देण्याची विनंती केली. ते मदत करणारे गृहस्थ होते. 'हिंदी चित्रपटांतल्या दयाळू माणसाच्या प्रतिमेमुळे तुम्ही तिथे प्रसिद्ध आहात. व्हिसा मिळायला तुम्हाला काहीच अडचण येणार नाही', ते मला म्हणाले. मी तेव्हा भारत-पाकिस्तान कौन्सिलचा उपाध्यक्ष होतो (अजूनही आहे). त्यांना त्यांच्या कार्यालयात भेटण्यासाठी मी एक दिवस ठरवला, आणि त्याप्रमाणे गेलो. त्यांनी मला आवश्यक ती सर्व कागदपत्रं दिली आणि दुसऱ्याच दिवशी, २३ मार्च १९९३ रोजी असणाऱ्या 'पाकिस्तान दिन' समारंभाचं आमंत्रणही दिलं. मुंबईच्या प्रेसिडेंट हॉटेलमध्ये हा समारंभ होता. मी त्याला गेलो. त्यात विशेष असं काही नव्हतं. कराचीतले आपले उच्चायुक्तही भारताच्या प्रजासत्ताक दिनाला २६ जानेवारीला तिथल्या प्रसिद्ध व्यक्तींना बोलावतात.

पण या वर्षी परिस्थिती वेगळी होती. ६ डिसेंबर १९९२नंतरचा तो काळ होता. अयोध्येची दुःखद घटना नुकतीच घडून गेली होती. जातीयवादी, हुकूमशाही शक्तींनी जाणूनबुजून वातावरण चिघळवलं होतं. बुद्धिवादी आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असणाऱ्या लोकांचा आवाजच त्यांनी दाबून टाकला होता. त्यामुळे २५ मार्च १९९३च्या 'इंडियन एक्सप्रेस'मध्ये शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांनी माझ्या (आताच्या आणि नंतर येणाऱ्याही) चित्रपटांवर बंदी घातल्याची घोषणा केल्याचं मी वाचलं. तेव्हा मला आश्चर्य वाटलं नाही. इतर अनेक प्रसिद्ध व्यक्तींबरोबर मी पाकिस्तान परराष्ट्र खात्याच्या या समारंभाला उपस्थित राहिल्याबद्दल ही बंदी घातली गेली होती! या समारंभाला गेलेला चित्रपट कलाकार मी एकटाच होतो. दिलीप कुमार, शबाना आझमी या कार्यक्रमाला आले नव्हते. पण निवडून मलाच दिलेली ही शिक्षा होती. कारण तेव्हाचे उपराष्ट्रपती के. आर. नारायणन, भाजपचे तत्कालीन अध्यक्ष मुरली मनोहर जोशी हेही दिल्लीतल्या तशाच समारंभाला हजर होते. मी धर्मनिरपेक्ष विचारांचा कलाकार असल्यामुळए हे करण्यात आलं होतं हे उघडच होतं.

त्यानंतर जवळजवळ दोन वर्षं मी बेकार होतो. भीतीमुळे चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटात मला भूमिका देणं बंद केलं होतं. माझ्या सर्व पिक्चरमधील भूमिका कापण्यात आल्या. 'रूप की रानी चोरों का राजा' आणि 'अपराधी' या पिक्चरमधील भूमिका कापण्यात आल्या. तसेच मी ज्या नवीन पिक्चरशी कॉन्ट्रॅक्ट केली होती तीसुद्धा रद्द करण्यात आली. जवळपास रोज रात्री मला धमक्या देणारे फोन येत असत. या सगळ्याचा माझ्यावर आर्थिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूपच परिणाम झाला. एवढी वर्षं निरपेक्षपणे देशाची सेवा केल्याची ही चांगली परतफेड होती!
गेल्या वर्षी २६ ऑगस्टला हंगल यांचं वयाच्या ९८व्या वर्षी मुंबईत निधन झालं.
***

'विकिपीडिया'वर हंगल यांची जन्मतारीख म्हणून १ फेब्रुवारी १९१४ असा उल्लेख आहे. एका चित्रपटविषयक नियतकालिकाला मुलाखत देत असताना त्यांची १५ ऑगस्ट अशी जन्मतारीख लागल्याचा उल्लेख पुस्तकात आहे. 'विकीपीडिया'वरच्या माहितीचा स्त्रोत माहीत नाही.
*** 

No comments:

Post a Comment