Tuesday 31 July 2012

आसाममध्ये काय चाललंय?

आसाममध्ये सध्या काय सुरू आहे?
'तेहेलका'त आलेल्या लेखातील चार परिच्छेदांचं हे भाषांतर. पूर्ण लेख वाचकांनी वाचावा यासाठी.
***

विश्वेश्वर बोडो (वय ८२) गोसाईगावमधल्या ओडलागुडी या आपल्या गावात जाण्यासाठी आतूर आहेत. कोक्राझार शहरापासून गाडीने ३० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या गोसाईगावमध्ये ते आपल्या मुलीकडे राहातात. पण वांशिक दंगल सुरू झाल्यानंतर कोक्राझार जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्यामुळे ते आपल्या घराच्याबाहेर पाऊलही टाकू शकत नाहीयेत. या हिंसाचारात आतापर्यत ४० जणांना प्राण गमवावे लागलेत.
'माझं गाव पेटत असल्याचं मी टीव्हीवर पाहिलं', डोळ्यांत आलेल्या पाण्यासकट विश्वेश्वर सांगतात. 'माझे शेजारी कुठे गेले मला माहीत नाही. गावी मी एकटाच राहात होतो. काही महिन्यांपूर्वीच माझ्या मुलीने मला इथे (गोसाईगावात) आणलं, त्यामुळे मी सुरक्षित आहे. किती काळ हे हिंसेचं चक्र सुरू राहणार आहे?'
बोडो, नेपाळी, कोच राजबोंगी, आदिवासी, बंगाली हिंदू आणि मुस्लीम निर्वासित (यांतील बहुतेक कथितरित्या बांग्लादेशातून बेकायदेशीररित्या आलेले) अशा विविध समुदायांचे घर असलेल्या तळ आसामात कित्येक वर्षं वांशिक, धार्मिक दंगली होत आल्या आहेत.
courtesy: UB Photos - Tehelka

या भागातील मानवी आराखड्यालाच बाधा आणणाऱ्या आणि जमिनीच्या मालकीवरून होणाऱ्या वादाला कारणीभूत ठरणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांच्या लोंढ्यांवर बोडो मंडळींचा मुख्य राग आहे. सध्या सुरू असलेला हिंसाचार १९ जुलैला सुरू झाला. संशयित बोडो बंडखोरांनी दोन मुस्लीम नेत्यांवर हल्ला केल्यानंतर या दंगली सुरू झाल्या नि वार-प्रतिवार होत आतापर्यंत किमान शंभर गावं जळून खाक झाली आहेत.

'१९ जुलैला रातुल अहमद आणि अब्दुल सिद्दीकी शेख यांच्यावर कोक्राझारमध्ये हल्ला झाला. गेल्या तीन वर्षांत, असे हल्ले केवळ मुस्लीमच नाही तर इतर समुदायांच्या नेत्यांवरही झाले आहेत. बोडोलँड प्रादेशिक परिषदेच्या (बोडोलँड टेरिटोरियर कौन्सिल - बीटीसी) प्रदेशात गेल्या कित्येक पिढ्या राहात असलेले इतर समुदायही भयग्रस्तच आहेत', ऑल आसाम मायनॉरिटीज् स्टुडन्ट्स युनियनचे अध्यक्ष अब्दुल रहिम अहमद सांगतात.

या हल्ल्याच्या संशयाची सुई पूर्वी अस्तित्त्वात असलेल्या बोडो लिबरेशन टायगर्सच्या (बीएलटी) बंडखोरांकडे वळली. २० जुलैला आत्मसमर्पण केलेल्या चार 'बीएलटी' बंडखोरांना लोकांच्या गर्दीने मारून टाकलं. त्यानंतर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे नि संचारबंदीचे आदेश देऊनही या प्रदेशात हिंसा सुरूच आहे.


नागरिकांची अवस्था-
मृत्यू-४०
बेपत्ता- २१
ताटकळत असलेले रेल्वे प्रवासी- ३० हजार
'रिलीफ कॅम्पां'मध्ये असलेले - ८० हजार
हिंसाचारग्रस्त, बेघर - दोन लाख

***

याच विषयावर
'काफिला'वर प्रसिद्ध झालेलं निवेदन
आणि
'लोकसत्ते'तला अग्रलेख

No comments:

Post a Comment